करंजकल्ला वळण सुरक्षिततेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आश्वासन, रस्तारोकोला स्थगिती
कळंब (प्रतिनिधी): करंजकल्ला वळणावरील धोकादायक परिस्थितीबाबत नागरिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने नमते घेत उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. एका महिन्याच्या आत सुरक्षा संदर्भातील सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्याचे पत्र आंदोलक अमर चाऊस यांना देण्यात आले असून, त्यामुळे प्रस्तावित रस्तारोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी व्यापारी रमेश शिवराज होनराव यांचा करंजकल्ला वळण समजले नाही म्हणून झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. दिनांक ११ ऑगस्ट रोजी करंजकल्ला वळणावर रस्तारोको करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिवसेना (उबाठा) व तालुका व्यापारी महामंडळाने कळंब–लातूर रस्त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निवेदन दिले होते.
लातूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागण्यांची गंभीर दखल घेतली असून, हायब्रीड अन्युटी अंतर्गत लातूर–कळंब रामा-२३६ रस्ता सुधारणा प्रकल्पातील ८४.२० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले. संबंधित कंत्राटदाराला उर्वरित काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या सर्व पुलांवर रस्ता सुरक्षा मार्गदर्शक फलक, पाईप डेलीनेटर, रिफ्लेक्टर आदी साधनांची बसवणी झाली आहे. करंजकल्ला व इतर धोकादायक वळणांवर सूचना फलक व क्रॅश बॅरिअर यांसारख्या उपाययोजना ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच, पावसाळा संपल्यानंतर पुलांची पुनर्बांधणी, रस्त्याचे डांबरीकरण, ड्रेनेज, रोड फर्निचर, शोल्डर फिलिंग आणि जंक्शन इम्प्रुव्हमेंट यांसारखी कामे तातडीने पूर्ण करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.
या निर्णयामुळे ११ ऑगस्ट रोजी होणाऱ्या करंजकल्ला वळणावरील रस्तारोको आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
