कळंबस्थानिक बातम्या

कळंब शहरात अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा कहर; नागरिकांचा प्रशासनाला सवाल

वार्षिक 1 कोटी खर्च असूनही स्वच्छता कामात ढिलाई – धूर फवारणीसाठी नागरिकांची मागणी

कळंब (प्रतिनिधी): शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. अस्वच्छता, नाल्यांमधील साचलेले पाणी आणि कचऱ्याचे ढीग यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढत आहे. स्वच्छता विभागाने केलेल्या निष्क्रीयतेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अस्वच्छतेचे साम्राज्य आणि डेंग्यूचा धोका

गेल्या काही आठवड्यांपासून शहरातील अनेक भागात डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. नाल्यांची साफसफाई, नियमित कचरा उचल आणि धूर फवारणी यासारखी मूलभूत स्वच्छता कामे होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पावसाळ्यानंतरही गटारांमध्ये साचलेले पाणी, रस्त्यांवरील कचरा आणि उघड्यावर टाकलेली घाण डेंग्यू डासांच्या प्रादुर्भावाला खतपाणी घालत आहे.

‘एक कोटी खर्च तरीही बदल नाही’ – नागरिकांचा संताप

शहरातील स्वच्छतेसाठी दरवर्षी सुमारे 1 कोटी रुपये खर्च केले जातात. तरीदेखील प्रत्यक्ष परिस्थितीत काहीच सुधारणा दिसत नाही. “हा पैसा वाया जात आहे आणि त्याचा नागरिकांना काहीही फायदा होत नाही,” असा संतप्त सवाल स्थानिक रहिवाशांनी ‘नवमत’शी बोलताना उपस्थित केला.

नाल्यांची साफसफाई सहा महिन्यांपासून नाही

काही भागात गेल्या सहा महिन्यांपासून नाल्यांची साफसफाई झालेली नाही. त्यामुळे डेंग्यूच्या डासांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट आले आहे.

तज्ज्ञांचा सल्ला आणि नागरिकांचा इशारा

आरोग्य तज्ज्ञांनी प्रशासनाला तातडीने धूर फवारणी, नाल्यांची साफसफाई आणि कचरा व्यवस्थापन सुधारण्याचा सल्ला दिला आहे. तसेच नागरिकांनीही पाणी साचू न देणे, टाक्या झाकून ठेवणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले.

नागरिकांनी इशारा दिला आहे की, जर तात्काळ कारवाई झाली नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!