कळंबस्थानिक बातम्या

कळंब-ढोकीत रेल्वे गाड्यांचा थांबा व्हावा, कृती समितीचा ठाम पवित्रा

खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलासदादा पाटील यांना निवेदन; स्थानक झाल्यास व्यापार व तिर्थक्षेत्र विकासाला चालना

कळंब (प्रतिनिधी): धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या नव्या रेल्वे मार्गावर कळंब रेल्वे स्टेशन व ढोकी येथे एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा, या मागणीसाठी कळंब कृती समितीच्या वतीने खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलासदादा पाटील यांना निवेदन देण्यात आले.

नवीन रेल्वे लाईनचे महत्त्व

नव्या रेल्वे लाईनचे अंतिम सर्वेक्षण पूर्ण झाले असून कळंब शहरात रेल्वे स्थानक व्हावे यासाठी समितीकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून धाराशिव येथे खासदारांना निवेदन सादर करण्यात आले.

कळंब रेल्वे स्थानक झाल्यास व्यापार, साखर कारखानदारी, आरोग्य सुविधा व तिर्थक्षेत्र विकास यांना मोठा फायदा होईल, असे समितीचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी सांगितले.

ढोकीत थांबा आवश्यक

ढोकी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस व मेल गाड्यांसह सर्व गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणीही समितीने केली. या मागणीस खासदार व आमदार यांनी पाठिंबा दर्शवून शिफारस पत्र समितीकडे सुपूर्द केले. थांबा मिळाल्यास कळंब, केज, धारूर, शिराढोण भागातील प्रवाशांचा वेळ व खर्च वाचणार आहे.

वंदे भारत गाडीची मागणी

बैठकीत लातूर-मुंबई वंदे भारत गाडी सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. याबाबत रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याशी लवकरच चर्चा होणार असल्याचे खासदारांनी आश्वासन दिले.

पोस्ट ऑफिस जागेचा प्रश्न

कळंब येथील पोस्ट ऑफिस जागेच्या हस्तांतरणाचा प्रश्नही उपस्थित झाला. बीएसएनएलच्या ताब्यातील जागेत अर्धा हिस्सा पोस्टाचा असून नगर परिषदेचे हस्तांतरण अद्याप झालेले नाही. या विषयावर नगर परिषदेच्या मदतीने लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन खासदार व आमदारांनी दिले.

या प्रसंगी ढोकी रेल्वे कृती समिती सदस्य राहुल वाकुरे, सचिव व पत्रकार इमरान शेख, ग्रामपंचायत सदस्य परवेज काझी, सुरेश टेकाळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!